मुंबईतील सर्व डबेवाले मेहनत करून लोकांना जेवण पोहोचविण्याचं पुण्यकर्म करीत आहेत. चांगलं काम करणाऱ्याला ईश्वर नेहमी मदत करीत असतो. आज डबेवाले सायकलवरून फिरत असले तरीही त्यांची मुले शिक्षणाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वावर प्रगती करून मोटरकार व विमानाने फिरतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. (governor bhagat singh koshyari distributes cycle to mumbai dabbawala)
राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील निवडक डबेवाल्यांना राजभवन इथं सोमवार १९ आॅक्टोबर रोजी सायकल वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या.
हेही वाचा- रेल्वेत प्रवास करण्याची परवानगी मिळाली, पण डबेवाले क्यूआर कोडमुळे त्रस्त
श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपाल म्हणाले की परोपकार करण्याची क्षमता ईश्वराने केवळ मनुष्याला दिली आहे, त्याचा माणसाने सदुपयोग केला पाहिजे. आपल्या देशात गरिबात गरीब व्यक्तिमध्ये आपल्या ताटातून अर्धे जेवण दुसर्या गरजूला देण्याची भावना आहे. अशा परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो, असं त्यांनी सांगितलं.
श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानचे शुभ्रांशु दिक्षीत यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात केलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. करोना काळात अनेक डब्बेवाल्यांच्या सायकली बंद पडून बिघडल्या व त्यांचा रोजगारही गेला. या सर्वांना पुनश्च रोजगार मिळवा या दृष्टीने सायकल वाटप करण्याचं ठरवलं, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी मुंबई डब्बावाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर उपस्थित होते.