मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक विद्यमान नगरसेवकांनी आपापल्या पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतला. कोणी निवडून न येण्याच्या भीतीने तर कुणी तिकीट कापल्या जाण्याच्या भीतीने दुसऱ्या पक्षात उडी मारली. मात्र युती आणि आघाडी तुटण्याआधी बंडखोरांचा सुरु असलेला हा प्रवेशाचा सिलसिला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत सुरु होता. मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांच्या तब्ब्ल 30 नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात घरोबा केला आहे.
सर्वाधिक जास्त नगरसेवक हे मनसे आणि काँग्रेसचे फुटले आहेत. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी 8 नगसेवक फुटले आहेत. त्याखालोखाल शिवसेना 4, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी 3 नगरसेवक आणि अपक्ष 4 अशाप्रकारे 30 नगरसेवकांनी आपल्या पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. मात्र आपल्या पक्षाला सोडल्यानंतर अन्य पक्षात जाताना शिवसेना पक्षाला अधिक पसंती आहे. शिवेसनेत 15 नगरसेवकांनी प्रवेश केला आणि भाजपात 9 नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.
नगरसेवकांनी कुणाचा झेंडा घेतला हाती
शिवसेनेत प्रवेश
गीता चव्हाण, सुरेश आवळे ,चेतन कदम, ईश्वर तायडे, दीपक पवार (मनसे), बाळा आंबेरकर, योगेश भोईर, भोमसिंह राठोड (काँग्रेस), रिद्धी खुरसुंगे, संध्या दोषी, सविता शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), विजय तांडेल, ललिता अन्नामलाई, मकरंद नार्वेकर (अपक्ष), शांताराम पाटील (समाजवादी पार्टी)
भाजपात प्रवेश
प्रकाश दरेकर, सुखदा पवार, भालचंद्र आंबोरे (मनसे), सागरसिंह ठाकूर, केशरीबेन पटेल (काँग्रेस), सुनीता यादव, नाना आंबोले, दिनेश पांचाळ (शिवसेना), लीना शुक्ला (अपक्ष)
काँग्रेसमध्ये प्रवेश
अश्रफ आझमी, दिलशाद आझमी (समाजवादी पक्ष)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
नेहा पाटील, वकील शेख (काँग्रेस)
मनसेत प्रवेश
विश्वास घाडीगावकर (शिवसेना)
एआयएमआयएममध्ये प्रवेश
वकाररुन्निसा अन्सारी
विद्यमान नगरसेवक आणि नेतेमंडळी जरी तिकिटासाठी हवं तिथे पक्षांतर करत असली, तरी सामान्य मतदारांकडून मात्र यावर नाराजी व्यक्त होताना दिसतेय. सामान्य मुंबईकरांच्या या काही प्रतिक्रिया...