वडाळा - भाजपाकडे कमळ नाही. तर त्यांच्या मनात मळ आहे. मात्र विकासाची तळमळ ही केवळ शिवसैनिकांमध्ये असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. वडाळा (पू.) येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
महानगरपालिकेत काम करण्याची कोणत्याही पक्षाची लायकी नाही, गेल्या 20 वर्षात शिवसेनेने जे काम केले ते कोणताही पक्ष करू शकत नाही असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी मुंबईकारांना घर मिळवून देणार असल्याची ग्वाहीही दिली. तसंच शिवसेनेला गुंडांचा पक्ष म्हणणाऱ्या भाजपात गुंडांची कमी नाही, 1992-93 मध्ये मुंबई वाचवण्यासाठी पुढे आलेला शिवसैनिक गुंड कसा? असा प्रश्नही त्यांनी विचारला. रस्ते, नाले आदी सर्व घोटाळे शिवसेनेने केले, असे म्हणणारे हे मुख्यमंत्री युतीत असताना एक नंबर क्रमांकाची पालिका अशी भाषणे देत होते. आता पालिका आणि पालिकेत सत्ता असणारे घोटाळेबाज कसे? कशासाठी केवळ खुर्ची मिळावी म्हणून असे खोटे बोलणारे मुख्यमंत्री या राज्याला लाभले याची लाज वाटते असं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलं.