पाच वर्षांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आलेल्या ऐतिहासिक एशिअॅटिक लायब्ररीत यंदा पावसाळ्यात पाणी शिरल्यानं अनेक पुस्तकांचं नुकसान झालं. त्यामुळे हे काम करणारे कंत्राटदार आणि संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
या लायब्ररीमध्ये अनेक दुर्मिळ आणि मौलिक ग्रंथ आहेत. असं असतानाही या वास्तूच्या कामांकडे वेळीच लक्ष का दिलं नाही? असा प्रश्न भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला.
त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी या वास्तूच्या दुरूस्तीचं काम पाच वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. त्यानंतर यावर्षी पावसाळ्यात पुन्हा गळती झाली. त्यामुळे पुन्हा एकदा दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येईल. सध्या पायऱ्यांच्या दुरूस्तीचं कामही सुरू असून, ते लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती दिली.
या चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं की, एशिअॅटिक लायब्ररीची वास्तू ब्रिटिश काळात बांधण्यात आली असून, या वास्तूची पहिल्या पायरीच्या उंची एवढी शहरातील बांधकामांची उंची राहिल्यास शहरातील घरांना पुराचा फटका बसणार नाही, अशा प्रकारची नोंद इतिहासात आहे. त्यामुळे या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व तर आहेच, शिवाय अत्यंत दुर्मिळ ग्रंथसंपदाही आहे. असं असताना या वास्तूची काळजी संबधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही. पुराचं पाणी घुसत नाही, म्हणून वरून पाण्याची गळती करण्यात आली की काय? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच पाच वर्षांपूर्वी केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, दोन्ही बाजूच्या सदस्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पाच वर्षांपूर्वी काम करणाऱ्या कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, असे मंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा
मुंबई एन्ट्री पॉइंट्सवर पूर्ण टोल बंदी करणं कठीण - चंद्रकांत पाटील