Advertisement

“अनिल देशमुख कायदा, राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीत”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा तुमच्यावर वरदहस्त असेल, तरीही तुम्ही कायदा आणि राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीत.

“अनिल देशमुख कायदा, राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीत”
SHARES

तुम्ही कितीही पॉवरफुल मराठा नेते असाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा तुमच्यावर वरदहस्त असेल, तरीही तुम्ही कायदा आणि राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीत, अशा शब्दांत अॅड. जयश्री पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल (anil deshmukh) देशमुखांवर टीका केली. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या सर्व प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. 

मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणावर सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिकांवरील निर्णय बुधवारी राखून ठेवला होता. यावेळी न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका कायद्याची प्रक्रिया न पाळल्याने रद्द केल्या. तर जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत प्राथमिक चौकशी करत १५ दिवसांत पूर्ण करण्यास सांगितलं आहे. 

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याचा मला आनंद आहे. एवढ्या मोठ्या १०० कोटीच्या प्रकरणात कोणी एक तरी शूर आहे जे समोर आलं आहेत, अशा शब्दांत न्यायालयाने माझं कौतुक केलं.

हेही वाचा- अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार, उच्च न्यायालयाचा आदेश

जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात आहेत. त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र पोलीस असतील तर चौकशी योग्य प्रकारे होऊ शकत नाही. त्यामुळे असामान्य स्थिती असल्याचं म्हणत न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला प्राथमिक तपास करण्यास सांगितलं आहे. १५ दिवसांत सीबीआयने प्राथमिक तपास पूर्ण करायचा आहे. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय सीबीआयने घ्यावा, असं न्यायालयाने म्हटल्याचं जयश्री पाटील यांनी सांगितलं.

पाेलीस डायरीत नाव न आल्याबद्दल जयश्री पाटील संताप व्यक्त करताना म्हणाल्या, अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचा (sharad pawar) तुमच्यावर वरदहस्त असेल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. ही मोगलाई नाही. इथं मोगली कायदे चालत नाहीत. भलेही तुम्ही माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. सरन्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय. तुम्ही उद्योजकांना, सर्वसामान्यांना अशा पद्धतीने धमकावू शकत नाही. माझा जीव घेतला तरी मी लढत राहणार आहे, असा निर्धारही जयश्री पाटील यांनी व्यक्त केला.

(jayashri patil slams anil deshmukh after bombay high court orders cbi inquiry in police transfer scam)

हेही वाचा- महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा