Advertisement

मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार ११ मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई इथं भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन सादर केलं.

मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार- उद्धव ठाकरे
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार ११ मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई इथं भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन सादर केलं. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रपतींना विनंती करणारं हे पत्र आहे. मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्यात येणार आहे. 

यावेळी ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, एकनाथ शिंदे तसंच माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितलं होतं की, आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपती व केंद्र शासनाचा आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने यात लक्ष घालून लवकरात लवकर पाऊलं उचलावीत, अशी विनंती करणारं पत्र मा. राष्ट्रपती महोदय व केंद्र शासनाला लिहिलं आहे. आपल्यामार्फत हे पत्र मा.राष्ट्रपती व केंद्र शासनाकडे पाठवावं, अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर समाजाच्या भावना लक्षात घेऊन केंद्र शासनाला याबाबत विनंती करायचं ठरवलं आणि त्यानुसार आज राज्यपालांना भेटून पहिलं पाऊल टाकलं आहे. आमचं म्हणणं ऐकून यासंदर्भात केंद्र शासनाकडे राज्यपाल महोदय कळवतील.

हेही वाचा- सीरम इन्स्टिटयूट सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल

मराठा समाजाचा समजूतदारपणा 

मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने संमत केला आहे, जनतेच्या भावनांचा आदर ठेवून हा निर्णय  झाला, तो न्यायालयात टिकला नसला तरी सरकार म्हणून आम्ही सर्व या समाजाच्या भावनांशी सहमत आहोत. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. आरक्षण प्रश्नी सरकार त्यांच्यासोबत आहे, याची समाजाला कल्पना आहे, ते सरकारच्या विरोधात नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यांच्या अधिकारासाठी पाठपुरावा

मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय हक्क मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आरक्षणाचा हा प्रश्न फक्त एका राज्याचा विषय नाही. तर देशातील अनेक राज्यांचा प्रश्न आहे. राज्यांचा अधिकार अबाधित राहावेत, यासाठीही केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

राज्याची बाजू मांडावी

पत्रकार परिषदेआधी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांना शिष्टमंडळाने निवेदनाचं पत्र दिलं. यावेळी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्या अनुषंगाने राज्यपाल महोदयांना माहिती दिली. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, सर्व पक्षाने सहमतीने मराठा आरक्षणाचा कायदा केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय मागास आयोगाचा व राष्ट्रपती महोदयांचा अधिकार असल्याचे निकालात नमूद केलं आहे. त्यामुळे राज्याचे पालक म्हणून राज्यपाल महोदयांनी केंद्र शासनाकडे तसंच मा.राष्ट्रपती महोदयांकडे या प्रश्नी राज्याची बाजू मांडावी. याप्रश्नी राज्यपाल महोदयांची भूमिका महत्त्वाची असून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.

(maha vikas aghadi leaders meet governor bhagat singh koshyari over maratha reservation)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा