राज्यभरात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन अनेक दिवस उलटूनही अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मात्र, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु, हे अधिवेशन संपलं तरी मंत्रिममंडळाचा विस्तारास अडथळे निर्माण होत असल्याचं चित्र दिसतं आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी अंतिम न झाल्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार आणखी काही दिवस लांबणीवर पडणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या याद्या मात्र तयार असल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी होणार असल्याची माहिती समोर येत होती. परंतु, काँग्रेसच्या मंत्र्याच्या यादीचा घोळ सुरू आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या २ माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. परंतु, केवळ अशोक चव्हाण यांचाच मंत्रिमंडळात समावेश होणार असून, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती मिळते.
दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार मंत्रिमंडळात प्रवेशासाठी लॉबिंग करत आहेत. विदर्भातून सुनील केदार, यशोमती ठाकूर, विजय वड्डेटीवार, मराठवाड्यातून अमित देशमुख, अशोक चव्हाण, पश्चिम महाराष्ट्रातून विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, उत्तर महाराष्ट्रातून के. सी. पाडवी, मुंबईतून वर्षा गायकवाड, अमीन पटेल आदींची नावे चर्चेत आहेत.
हेही वाचा -
सुभाष देसाईंच्या दालनात आदित्य ठाकरेंचा फोटो
'जेट एअरवेज'चं विमान पुन्हा होणार टेक आॅफ?