Advertisement

सर्वसामान्यांना हक्काचं घर देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलंय- उद्धव ठाकरे

सर्वसामान्य जनतेला त्यांचं हक्काचं घर देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं असून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

सर्वसामान्यांना हक्काचं घर देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलंय- उद्धव ठाकरे
SHARES

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यांचं हक्काचं घर देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं असून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

चाळीतील कष्टकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होणं अशक्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिलं. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचं सुंदर वर्णनच केलं आहे. अनेक क्रांतिकारी चळवळी तसेच आणि मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्या लोकांचं फार मोठं योगदान मुंबईच्या विकासात राहिलं आहे .आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही.

हेही वाचा- शिवसेना भवनाशी पंगा घेणारा माणूस अद्याप जन्माला यायचाय- शिवसेना

चाळीतील संस्कृती, मराठीपण जपून ठेवा

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचं वास्तव्य या मुंबईच्या चाळींमध्यं होतं. या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका, अख्खं आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचं आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.येथील ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्यांना जन्माला घातलं आहे, त्या ठिकाणीच आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ग्रामीण भागात ५ लाख घरे

गेल्या काही महिन्यात सुमारे ५ लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच राहिले, मी त्यांच्याकडे लहानपणापासून जायचो, त्यामुळे चाळीतले जीवन मला माहिती आहे, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होतं. महाराष्ट्राच्या ऐक्याचं इथं दर्शन घडतं. अनेक जाती- धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकसंधपणे इथं राहत आहेत. अशा या चाळींचा इतिहास आपण जतन केला पाहिजे. या चाळींमध्ये घरासोबतच लोकांना अन्य सुविधाही दिल्या पाहिजेत. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसंच या भागातील मराठी टक्का कमी करू नका, असंही पवार यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा