Advertisement

“कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा”

आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा”
SHARES

कोरोना संसर्ग रोखणं आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणं आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते शनिवारी वृत्तपत्रांचे  संपादक, मालक, वितरक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते.  

संसर्गाचं राजकारण रोखा

मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार, आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते गांभीर्याने पाळल्याने साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभं राहिलं आहे. सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. 

हेही वाचा- तर कडक निर्बंध लावावेच लागतील, मुख्यमंत्र्यांनी दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचं राजकारण नको. आपण विविध सूचना दिल्यात त्या  सरकार निश्चितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करेल. मात्र कोरोनाशी लढताना भीतीचं वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊ यादृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्याकामी  माध्यमांनी सहकार्य करावं.

जनतेचं हित पाहूनच निर्णय

आज आपण ऑक्सिजन उत्पादन कसे वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवता येईल, खासगी व बंधपत्र-करार स्वरूपाने डॉक्टर्सच्या सेवा कशा उपयोगात आणता येईल, त्याचाही विचार करीत आहोत. ज्येष्ठ डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सेवाही कशा घेता येतील, ई- आयसीयूचा उपयोग कसा करता येईल, तेही पाहतो आहोत. असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचं हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनीदेखील त्यामागील हेतू पाहावा व वस्तुस्थिती मांडावी.

या बैठकीत लोकांची प्रतिरोधक शक्ती वाढविण्यासाठी उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर, टेलिमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर नियंत्रणाला प्राधान्य, दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना विक्रीची परवानगी, कोविड केंद्रांसंदर्भातील धास्ती कमी करणं, वारंवार जनतेशी संवाद साधणं अशा विविध सूचना देण्यात आल्या.

(maharashtra cm uddhav thackeray interaction with media house representative ahead of lockdown)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा