कोरोना विषाणूचा संसर्ग फोफावत असताना राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देणं सध्याच्या स्थितीत गरजेचं आहे. त्यामुळे वयाची अट शिथील करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे.
त्यामुळे आता लसीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांना लस देणं गरजेचं आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणं सोपं होईल. देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही हे दुर्दैवी आहे, असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा- “‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम फोल; ‘त्यांच्या’ कुटुंबातील व्यक्तींनाच कोरोना”
राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या!: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 2, 2021
वयाची अट शिथील करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा. pic.twitter.com/qpkt5wxLJw
लसीकरणाच्या मोहिमेवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, देशात महामारी ही काही पहिल्यांदा आलेली नाही. काँग्रेसचे सरकार असताना महामारींचा सामना करावा लागला होता. त्यासाठी तत्कालीन काँग्रेस (congress) सरकारने योग्य नियोजन करुन त्यावर यशस्वी मात केली. पोलीओ लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमणात राबविली होती. बस स्टँट, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवल्याने त्यावर मात करण्यात यश आलं. पोलीओवर जर मात करता येऊ शकली तर कोरोनावर मात करणंही शक्य आहे.
ज्या झपाट्याने कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या वाढत आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने लसीकरण केलं गेलं पाहिजे. परंतु, महाराष्ट्राला कोरोना लसीची नितांत गरज असताना केंद्र सरकार मात्र अत्यल्प लस पुरवठा करत आहे आणि पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे.
गरज आहे ती केंद्र सरकारने दृढ निश्चय करुन सार्वत्रिकरित्या मोठ्या प्रमाणात तसंच सरसकट कोरोना लसीकरणाची मोहीम राबवण्याची. केंद्र सरकारने राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केल्यास कोरोनाच्या महामारीवरही नक्कीच मात करता येईल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात (maharashtra) कोरोनाची रुग्णसंख्या देशात जास्त असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करा, अशी मागणी करून जनतेनेही कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावं. मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, अशी विनंतीही नाना पटोले यांनी केली.
(maharashtra congress president nana patole demands covid 19 vaccination for above all 18 years old persons)