महाराष्ट्र सरकारने कोरोना उपचारांचा सगळा गोंधळ उडवलाय. इंजेक्शनचा पत्ता नाही, त्याच्यासाठी काही प्रयत्न नाही. लसीचा सगळा गोंधळ. प्रत्येक विषयात केंद्राला दोष देणार असाल, तर राज्यच केंद्राकडे द्या ना चालवायला, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी लस पुरवठ्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लशींच्या पुरवठ्यावरून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला चांगलंच ठोकलं. की कसं महाराष्ट्रात लसीकरणाच्या बाबतीत तुम्ही सगळा सावळागोंधळ करून ठेवलाय. प्रत्येक विषयात जर तुम्ही केंद्र सरकारला दोष देणार असाल, तर त्यापेक्षा राज्यच केंद्राकडे चालवायला द्या.
राज्य तुम्ही चालवणार, हप्ते तुम्ही वसूल करणार, कोरोनामध्येही भ्रष्टाचार तुम्ही करणार आणि दोष देणार केंद्राला. मग त्यापेक्षा केंद्राकडेच राज्य चालवायला द्या. आमची तशी मागणी नाहीय. पण काहीही झालं की केंद्र? जयंत पाटील उठणार की केंद्र, जितेंद्र आव्हाड उठणार की केंद्र. किती वेळा आकडे मांडले, ते साइटवरही असतात की कुणाला किती दिलं ते. तुम्हाला राज्य चालवताच येत नसेल, तर सोडा ना राज्य. राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजपची नाही. परंतु राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय लागतं? हे मला तज्ज्ञांनी सांगावं, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी हाणला.
हेही वाचा- इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रालाच लस कमी का?, राजेश टोपेंनी आकडेवारीच काढली
कोरोना उपचारांचा सगळा गोंधळ उडवलाय राज्य सरकारने... इंजेक्शनचा पत्ता नाही... त्याच्यासाठी काही प्रयत्न नाही. लसीचा सगळा गोंधळ... प्रत्येक विषयात केंद्राला दोष देणार असाल, तर राज्यच केंद्राकडे द्या ना चालवायला.... - @ChDadaPatil pic.twitter.com/bC3RXQeb1J
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 8, 2021
दरम्यान, लशींच्या पुरवठ्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील लशींच्या पुरवठ्याची स्थिती सांगितली. ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी केंद्राकडून फक्त ७.५ लाख लसीचे डोस मिळाले आहेत. तर उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लशीचं वाटप झालं आहे.
महाराष्ट्रात (maharashtra) सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४.५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३० लाख आहे. अशी परिस्थिती असताना आम्हाला फक्त ७.५ लाख लशी का? असा प्रश्न उपस्थित करताना या ऑर्डरसंदर्भात मी तातडीने डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
(maharashtra government not capable to handle covid 19 situation blames chandrakant patil)