नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सोमवारी सौदी अराम्को आणि अॅडनॉक या दोन कंपन्यांसोबत ३ लाख कोटी रुपयांचा आर्थिक सामंजस्य करार केला अाहे. यावरून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची नाणार रिफायनरी प्रकल्पासाठीची भूसंपादन अधिसूचना रद्द केल्याची घोषणा खोटी होती हे सिध्द झालं आहे.
खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि उध्दव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
खा. चव्हाण म्हणाले, नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी अाहे. शिवसेनेचे नेते वारंवार खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. २४ एप्रिल २०१८ रोजी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करत आहे, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई नाणारमधील जाहीर सभेत म्हणाले होते. मात्र, अद्याप अधिसूचना रद्द झाली नाही. एक अधिसूचना रद्द करायला एवढा वेळ लागतो का? उध्दव ठाकरे यांनीही वारंवार नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. अशा घोषणा केल्या. मात्र शिवसेनेच्या बोलण्यात आणि कृतीत फरक असल्याचं वारंवार दिसून आलं आहे.
शिवसेना कोकणवासियांचे नाही तर स्वतःचं हित पाहत आहे. नाणारला विरोध आहे असं दाखवून शिवसेना भाजपशी सौदेबाजी करत आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दोऱ्यात यांचा सौदा बहुतेक ठरला आहे असं दिसतं. कदाचित त्यामुळेच शिवसेनेचा नाणारला असणारा विरोध मावळलेला दिसत आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेला लगावला.
हेही वाचा -
प्लास्टिक बंदीमागे निवडणूक फंडाचं धोरण, राज यांचा आरोप
घटनेचा खून करणारेच आता घटनेची काळजी करताहेत- मोदी