मुंबईला जगभरातील उद्योगांचं महत्त्वाचं केंद्र बनवण्यासाठी राज्याने 'स्टार्ट अप पॉलिसी'चं स्वागतार्ह पाऊल उचललं आहे. उद्योजकांना आवश्यक आणि पोषक वातावरणनिर्मिती करणं हे राज्याच्या 'स्टार्ट अप पॉलिसी'चं उद्दिष्ट आहे. त्यामुळे या पाॅलिसीचं सर्वच उद्योजकांकडून स्वागत होत आहे. या पाॅलिसीला राज्य मंत्रीमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्रातील उद्योजकता वाढीस लागावी यासाठी नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ५ लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. पुढील ५ वर्षांत जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमता, माहिती तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जानिर्मिती आदी क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं धोरणातून स्पष्ट करण्यात आलं आहे. मोठ्या संख्येने असलेल्या तंत्रकुशल तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री संभाजी निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे धोरण तयार करण्यात आलं असून, त्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांचा मोठा वाटा आहे.