मुंबई - एकेकाळी आघाडी सरकारवर सडकून टीका करणाऱ्या भाजपा-शिवसेनेला सत्तेत आल्यानंतर मात्र गिरणी कामगारांचा विसर पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे नाराज झालेले गिरणी कामगार बुधवारी रस्त्यावर उतरले. या वेळी त्यांनी मुंबईतच मोफत घरं मिळावीत अशी मागणी करत याचा योग्य विचार झाला नाही तर सरकारलाही निवडणुकीत योग्य धडा शिकवू, असा इशारा दिला.
अभ्युदयनगर भगतसिंग मैदानातून गिरणी कामगारांचा इशारा मार्चा बुधवारी निघाला. संध्याकाळी सहा वाजता मोर्चा वरळीतील डॉ. आंबेडकर मैदानात पोहचला आणि तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी गिरणी कामगारांनी मार्चमध्ये मुंबईतच मोफत घरे देण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरकारला दिल्याची माहिती कामगार नेते बी. के. आंब्रे यांनी दिली आहे.