सरकार नवीन नोकऱ्याच निर्माण करणार नसेल तर आरक्षणाचा काय उपयोग होणार? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नवी मुंबई येथील कर्मचारी संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही सडाडून टीका केली. देशात एकीकडे इतक्या समस्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी योगाभासात व्यस्त असतात, असा टोला त्यांनी लगावला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनातील 7500 तरुणांवर 307 या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. मग सरकारने आरक्षण जरी लागू केलं तरी या साडेसात हजार तरुणांना नोकरी मिळणार का? त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त नाही का होणार? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
एकीकडे आंदोलन पेटवायचं आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करून अशा युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप यावेळी राज ठाकरे यांनी केला. राज्यातच नाही तर देशभरात लाखो जागा रिकाम्या आहेत. जर या जागा भरल्या गेल्या तर आरक्षणाची गरजच राहणार नाही. पण या सरकारकडे पैसेच नसल्याने ते या जागा भरूच शकत नाही. सभांमध्ये मात्र लाखो कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली जाते. मग यांच्याकडे पैसेच नाहीत तर हे कुठून पैसे देणार? आज जो तो पक्ष राजकरण करत आहे. मात्र सुधारणा करताना कोणीच दिसत नाही.
यावेळी त्यांनी 'मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडपाच्या आकारावरून नोंदवलेल्या आक्षेपावरही सवाल उपस्थित केला. हिंदू सणांवरच आक्षेप का घेतला जातो? रस्त्यावर नमाज का होऊ दिला जातो? मशिदीवरचे भोंगे का चालतात? त्यावर कोणताच आक्षेप का घेतला जात नाही'.
देशभरात सध्या हिप्नोटाईझचे प्रयोग सुरू आहेत. एखादा मुद्दा झाकण्यासाठी दुसरा मुद्दा काढला जातो, असं म्हणत राज यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला.