प्रत्येक गोष्ट जातीय दृष्टिकोनातून बघितली जात आहे. प्रत्येक गोष्टीलाच जातीचं लेबल लावलं जात आहे. त्यामुळे सगळा विचका झाल्याची खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी राज ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
सध्याचं राजकारण आणि जातीय समिकरणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळी समाजाचे, शिवाजी महाराज मराठ्यांचे …याच नजरेतून या महापुरुषांकडे आपण बघत आहोत. कारण आपल्याला सगळ्या गोष्टींकडे जातीच्या चष्म्यातून बघण्याची सवय लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला जातीच्या आधारावर राजकारणी सर्वसामान्यांना वापरून घेत असल्याचं आपल्या लक्षातच येत नाही. हा महाराष्ट्र जातीच्या बाहेर बघणार की नाही?' असा प्रश्नही राज यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा- आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला, महानगर पालिका निवडणुका एकत्र लढवणार?
महाविकास आघाडीच्या स्थापनेवर भाष्य करताना त्यांनी सांगितलं, सध्याचं राजकारण हे विचित्र आहे. एकासोबत निवडणुका लढवायच्या आणि दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन करायची. आज सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षात बसला आहे, हे सगळं दुर्देवी आहे.निवडणुकीत कोण उभं राहिलं, कोणी कोणाला मत दिलं, कोण निवडून आलं, कोण विरोधी पक्षात बसलं, कोण सत्तेवर आलं हे सगळंच अनाकलनीय आहे. हा प्रकार बघून यापुढे आपण कोणाला मत द्यायचं, का मत द्यायचं हा प्रश्न या राज्यातील मतदारांना पडला नाही, तरच नवल.
भविष्यात मनसेची वाटचाल कशी असेल, कुणासोबत युती करणार? या प्रश्नावर बोलताना सध्या आमचा पक्ष बॅचलर आहे. आम्हाला युतीचा 'टच' नाही. तो विचार आला, तरी आमच्या डोळ्यांत 'टच'कन पाणी येतं, असं राज ठाकरे यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
मराठीच्या मुद्द्यावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू या राज्यांत तेथील प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे. कारण तेथील जनता आणि राजकर्ते दोघांनाही त्यांच्या भाषेविषयी आपुलकी आहे, तिचा अभिमान आहे. परंतु महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा उपस्थित केला की हा मुद्दा फक्त मुंबई, पुण्यापुरता मर्यादीत असल्याचं काहीजण म्हणतात. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही मराठीचा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळेच कदाचित महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांच्या हाती एकहाती सत्ता येत नाही, असं निरिक्षण त्यांनी नोंदवलं.
हेही वाचा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह उद्गार, मालवणी पोलिसांनी केली एकाला अटक