मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदिबाहेर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मशिदिबाहेरील भोंग्यांच्या वक्तव्यावरून पक्षातील मुस्लीम कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसून येत आहे.
मुंबई आणि मराठवाड्यातील ३५ मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. मनविसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांच्यासोबत ३५ जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मनविसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांनी देखील राजीनामा दिला आहे.
“मी गेल्या अनेक वर्षांपासून मनसेसोबत काम करत आहे. मात्र राज साहेब ठाकरे यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे काम करणं कठीण झाले आहे. ज्या कुटुंबानं मला तुमच्यासोबत काम करण्याची प्रेरणा दिली, मात्र आता त्यांच्याकडूनच विरोध होत आहे. मी एक मनसेचा सामान्य कार्यकर्ता आहे, अनेक आंदोलनात सहभागी झालो. मात्र बदललेल्या भूमिकेमुळे मला राजीनामा द्यावा लागत आहे. मला अशा आहे की, तुम्ही राज्यासाठी आणि मराठी बांधवांसाठी काम करत राहाल. माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करावा” असे फिरोज खान यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
राज ठाकरे यांची मुंबईमध्ये सभा झाली होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत मशिदिवरील भोंगे उतरवले जावे असे म्हटले होते. तसंच जिथे भोंग चालू राहातील तिथे आम्ही हनुमान चालीसा लावू असं म्हटलं होतं.
यासोबत महविकास आघाडीला राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला आहे. ते म्हणाले की, ३ मेनंतरही भोंगे मशिदिबाहेर दिसले नाही पाहिजेत. नाहीतर हनुमान चालिसा लावली जाईल. आता येत्या काळात हा मुद्दा आणखी तापणार अशीच चिन्हं दिसत आहेत.
हेही वाचा