वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसेचे कार्यकर्ते राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन करत आहेत. मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकाऱ्या कार्यावर मनसेच्या नेत्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोडफोड करु नये असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करून हे आंदोलन केल जात असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांनी दिली आहे. मात्र, ठाण्यात मनसेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे पोलिसांकडून मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा काढला. यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मोर्चाचं नेतृत्व करत होते.
पोलिसांनी मनसेचा मोर्चा सुरू होताच अडवणूक केली त्यानंतर आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच, पुण्यात मनसेच्या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली होती. तर मनसेचा गड मानला जाणाऱ्या नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. नागपुरात देखील मनसेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव वीजबिला संदर्भातील निवेदन दिलं.
मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांच्यावतीनं निवेदन देण्यात आल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. 'वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांचं पत्र आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी मोर्चाकाढून निवदेन दिलं आहे. पण वीज बिलासाठी कुणी मीटर कापण्यासाठी जनतेच्या घरी आलं तर त्यांच्या कानाखाली इलेक्ट्रीक शॉक दिल्याशिवाय महाराष्ट्रसैनिक गप्प बसणार नाही आणि याची जबाबदारी प्रशासनाची असेल', असं संदीप देशपांडे म्हटलं.