छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील काँग्रेसच्या मुख्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरूपम यांनी मनसेला सडेतोड उत्तर देण्याची भाषा केली आहे. तर दुसऱ्या बाजूला मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान दि. इंदिरा गांधी यांच्या लोकसभेतील भाषणाचा दाखला देत मनसेने काँग्रेसला त्यांच्याच नेत्याच्या शब्दांतून घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला आहे.
'परप्रांतीयांचे लोंढे आणि राज्यांवर वाढणारा तणाव' या विषयावर इंदिरा गांधी यांनी १३ डिसेंबर १९७२ साली लोकसभेच्या भाषणात मांडलेलं परखड मत मनसेने आपल्या ‘मनसे अधिकृत’ फेसबुक पेजवर टाकलं आहे. सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ देखील टाकला आहे.
'एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या अघोरी स्थलांतरामुळे राज्यावर ताण येतो आणि स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी आणि नागरी सुविधा तोकड्या पडतात' हाच धोका माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी लोकसभेत विषद केलेला. हीच नागरी समस्या राज ठाकरे सुरुवातीपासून मांडत आहेत.