Advertisement

‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्या’, शालिनी ठाकरेंचं महापौरांना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी महापौरांना पत्र लिहित “जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्या”, अशी मागणी केली आहे. शालिनी ठाकरे यांनी फेसबुकवर हे पत्र देखील शेअर केलं आहे.

‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्या’, शालिनी ठाकरेंचं महापौरांना पत्र
SHARES

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझमध्ये एका महिलेशी वाद घालत तिचा हात मुरगळल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. अशी कुठलीही घटना घडलेली नसल्याचा दावा महापौर करत असले, तरी याप्रकरणी महाडेश्वर यांच्यावर सर्वच स्तरातून तीव्र टीका होत आहे. याचप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी महापौरांना पत्र लिहित “जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्या”, अशी मागणी केली आहे. शालिनी ठाकरे यांनी फेसबुकवर हे पत्र देखील शेअर केलं आहे.

काय आहे प्रकरण?

वाकोला परिसरातील पटेल नगर इथं माला नागम व संकेत नागम या दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी अदानी इलेक्ट्रिक कंपनीविरोधात नाराजी दर्शवत पश्चिम द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको केला. यानंतर सोमवारी महापौर महाडेश्वर यांनी स्थानिक नगरसेविका प्रज्ञा भूतकर यांच्यासह मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक महिलांनी महापौरांना रस्त्यातच अडवलं. यावेळी महिला आणि महापौरांमध्ये वाद झाला. त्याचाच व्हिडिओ नंतर व्हायरल झाला.

याप्रकरणी महापौरांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर शालिनी ठाकरे यांनी महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 


काय लिहिलंय पत्रात?

‘माननीय’ किंवा ‘आदरणीय’ ही विशेषणं तुमच्या नावासमोर किंवा पदासमोर लावण्यासारखं तुमचं वर्तन नाही, म्हणून फक्त ‘महोदय’ असंच म्हणत आहे.

परवा सांताक्रूझ- वाकोला येथील पटेलनगरमध्ये माला नागम व संकेत नागम या मायलेकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर तिथे जनक्षोभ उसळला आणि स्थानिक महिला-पुरुषांनी तुम्हाला दुर्दैवी कुटुंबाच्या घरी जाण्यापासून रोखलं. तिथल्या स्थानिक महिलांनी तर तुम्हाला गराडाच घातला. या महिलांमध्ये आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कार्यकर्त्याही होत्याच. या सर्व महिलांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, त्यांच्या संतप्त भावनांचा मान राखण्याऐवजी तुम्ही महिलांनाच उद्देशून “ए दादागिरी करू नकोस, तुला माहीत नाही मी कोण आहे” असं वक्तव्य केलंत. इतकंच नव्हे तर, एका तरुणीचा हात पकडून तो मुरगळण्यापर्यंत तुमची मजल गेली. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हे दुष्कृत्य करण्याचा माजोरडेपणा तुम्ही केलात. ही सर्व घटना व्हिडिओत कैद झाली आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून अवघ्या देशाला ‘मुंबईच्या महापौरांचे प्रताप’ समजले आणि प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाची मान शरमेने खाली गेली.

या संपूर्ण घटनेनंतर “माझी राजकीय प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न करणा-या मनसे पदाधिका-यांचा मी निषेध करतो” असं मत तुम्ही व्यक्त केलं आहे. पण स्थानिक लोक आणि विशेषत: महिला तुमच्यावर का संतापल्या, हे जाणून घेणं तुम्हाला महत्वाचं वाटलं नाही. स्वत:च्या नावापुढे ‘प्रिन्सिपल’ लावता, पण प्रिन्सिपलसारखं वागत नसाल तर काय फायदा?

तुमच्यावर ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तुमच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे करणार आहोत. राज्य महिला आयोगाकडेही तुमच्याविरोधात साधार पुराव्यांसह दाद मागणार आहोत. मात्र हे सारं करताना मुंबईच्या महापौर पदाची शान धुळीला मिळणार, याविषयी खेद वाटतोय. म्हणूनच ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगून’ तुम्ही तत्काळ महापौरपदाचा राजीनामा द्यावा आणि महापौरपदाचा उरला-सुरला मान जपावा, ही तुमच्याकडे ‘शेवटची मागणी’ !



हेही वाचा-

महापौरांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, काँग्रेसची मागणी

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ३६२.०४ चौरस मीटर वाढीव जागा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा