इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामधील जगातील आघाडीची ऑटो कंपनी टेस्लानं अखेर भारतात पदार्पण केलं आहे. भारतातील आपल्या व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी टेस्लानं आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूची निवड केली आहे.
महाराष्ट्राऐवजी बंगळुरूमधून कंपनीनं व्यवसायाला सुरूवात केल्यानं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत टेस्लाला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण आदित्य ठाकरेंनी दिलं होतं. तसंच हे निमंत्रण केवळ गुंतवणूकीसाठी नाही तर भविष्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विचार करुन दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली होती.
संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंच्या त्याच ट्विटला उत्तर दिलं. संदीप देशपांडे म्हणाले की, रिप्लाय देताना टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका, असं लिहत त्यांनी आदित्य यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड नावानं टेस्ला कंपनीनं बंगळुरूमध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे. यासोबतच तीन डायरेक्टर्सचीही कंपनीनं नियुक्ती केली आहे. टेस्ला भारतात लग्जरी इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन घेईल.
हेही वाचा