पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा घातपाताच्या कटाचा पर्दाफाश करत या प्रकरणी सनातन आणि शिवप्रतिष्ठानशी संबंधित लोकांना अटक केली आहे. सरकारने या कट्टरतावादी संघटनांच्या कारवाईकडे जाणिवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळेच राज्यात कट्टरतेची विषवल्ली वाढली, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
राज्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात घातपात घडवण्याचा कट्टरवादी संघटनांचा कट होता हे स्पष्ट झालं आहे. सनातन संस्थेसोबतच मनोहर भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्तेसुद्धा या कटात सामील आहेत, हे दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईने उघड झालं आहे. पोलिसांनी कारवाई करून 20 जीवंत बॉम्ब आणि जवळपास 50 बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले.
या प्रकरणात सनातनचा साधक वैभव राऊत याच्यासोबतच शिवप्रतिष्ठानच्या सुधन्वा गोंधळेकर यालाही अटक केली आहे.
शिवप्रतिष्ठानच्या अनेक कार्यकर्त्यांचा समाजविघातक कृत्यामध्ये सहभाग असल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सुत्रधार आणि अनेक समाजविघातक कृत्ये आणि दंगलीतील आरोपी आहेत. पण सरकार जाणिवपूर्क भिडेंच्या कृत्यावर पांघरूण घालून त्यांना संरक्षण देत आहे.
सरकार मनोहर भिडेला कधीपर्यंत संरक्षण देणार आहे? असा सवाल करून राजकीय फायद्याचा विचार न करता सरकारने कट्टरतेची विषवल्ली मुळासकट उखडून टाकावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.