मुंबईत फेरीवाल्यांवरून सुरू असलेला वाद संपण्याचे नाव घेत नाही. या मुद्द्यावरून आता मनसे आणि काँग्रेस आमने सामने उभे ठाकले आहेत. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ बुधवारी सकाळी दादरमध्ये मूक मोर्चा काढला आहे. जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन निरुपम यांनी केले आहे.
फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी हा 'फेरीवाला सन्मान मोर्चा' काढणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसने दिली. यापूर्वी मनसे विभाग अध्यक्ष संजय माळवदे यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मालाडमध्ये फेरीवाल्यांशी संवाद साधला होता.
दादर (प.) येथील नक्षत्र मॉल इथून हा मोर्चा काढण्यात आला आहे. याला पोलिसांनी देखील परवागी मिळाली आहे. सुरुवातीला हा मोर्चा स्टार मॉल येथून काढला जाणार होता पण पोलिसांनी त्याला परवानगी दिली नसल्याने हा मोर्चा नक्षत्र मॉल येथून काढण्यात आला.
मुंबई कांग्रेस का फेरीवाला सम्मान मार्च
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) October 31, 2017
कल,1 नवम्बर,11 बजे दिन में
रानाडे रोड,दादर
सभी फेरीवाले शामिल हों।
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबई शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मध्ये 5 ऑक्टोबर रोजी संताप मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना राज यांनी मुंबई शहरातील फेरीवाले15 दिवसात हटवण्याची मागणी केली होती. 15 दिवसांत फेरीवाले हद्दपार झाले नाही, तर मनसे स्टाईलमध्ये त्यांना हकलवू, अशी घोषणा राज यांनी या वेळी केली होती. 15 दिवसांत काही स्टेशनवरचे फेरीवाले कमी झाले देखील पण काही ठिकाणी फेरीवाल्यांनी पुन्हा तहान मांडल्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी फेरीवाल्यांच्या वस्तूंची तोडफोड केली. या प्रकरणामुळे चिडलेल्या फेरीवाल्यांनी काही मनसैनिकाना मारहाण केली. या वादामुळे काही मनसे कार्यकत्यांना पोलिसांनी अटक केली होती.
मनसेने घेतलेल्या पवित्र्यामुळे काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांना पाठिंबा देताना मनसे विरुद्ध भाष्य केल्यामुळे मनसे आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सध्या राजकीय युद्ध पहायला मिळत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे या प्रकरणामुळे सध्या भूमिगत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, संजय निरुपम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बुधवारच्या मोर्चात निरुपम सहभागी झाले तर भर मोर्चात मनसैनिकांचा राडा दादरसह मुंबईकरांना पहायला मिळेल असा इशारा मनसेने दिला.
हेही वाचा -
काँग्रेस काढणार फेरीवाल्यांसाठी मोर्चा