सुधारीत नागरिकत्व कायदा (CAA) राबवून केंद्र सरकार देशाला तुरूंग बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रकार हाणून पाडण्यासाठी समाजातील सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन दीर्घकालीन लढा देण्याची गरज असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा- सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध - राज्यपाल
नागपाड्यातील जामिया काद्रिया अश्रफिया मदरशातील मौलानांशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मदरशाचे प्रमुख मौलाना मोईनुद्दीन अश्रफ, रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नुरी, सर्फराज आरजू उपस्थित होते.
यावेळी आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकारला कुठल्याही प्रकारे हा कायदा नागरिकांवर आम्ही लादू देणार नाही. सरकारी कागदपत्रांमध्ये नागरिकांच्या वास्तव्याचे पुरावे असल्याने आम्ही सरकारला कुठलीही कागदपत्रं सादर करणार नाही. केवळ अल्पसंख्यांक समुदयातील नागरिकच नाही, तर हिंदु धर्मातील जातीजमातींनाही या कायद्याचा फटका बसू शकतो. या कायद्याला विरोध करण्यासाठी समाजातील सर्व समाजघटकांनी दीर्घकालीन लढा देण्याची गरज आहे. यासाठी दलित, मुस्लीम, ओबीसी यांनी एकत्र आलं पाहिजे, असंही आंबेडकर यांनी सांगितलं.
हेही वाचा- मनसेच्या महाअधिवेशनात ‘राज’पुत्राचं अधिकृत पदार्पण?