शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.
धर्मा पाटील यांची एक प्रकारे हत्याच केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून टीका केली आहे.
धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीसुद्धा सरकारवर टीका करत ‘सरकारचं सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचं सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले. या सरकारचा धिक्कार असून धर्मा पाटील यांच्या निधनासाठी राज्य सरकारच जबाबदार आहे'. अशी प्रतिक्रिया ट्विटरवरून व्यक्त केली जात आहे. संबंधितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
धुळे जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांची शेतजमीन सरकारने उर्जा प्रकल्पासाठी ताब्यात घेतली होती. मात्र, या जमिनीला सरकारी भावाने मोबदला देण्यात आला. या अन्यायाविरोधात धर्मा पाटील हे गेली दोन वर्षे लढा देत होते. गेल्याच आठवड्यात त्यांनी मंत्रालयात विषप्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जे. जे. रूग्णालयात ठेवण्यात आलं होतं. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.