Advertisement

बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन; मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन; मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
SHARES

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही - मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे

“पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी शोकही व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी - उपमुख्यमंत्री अजित पवार

“ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली..

“प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच! नुकतेच त्यांचे १०० व्या वर्षात पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही.

बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ,‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा! बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता,” असे देवेंद्र फडणवीसांनी शोकसंदेशात म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली

बाबासाहेबांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पुढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील,” असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

त्यांचं योगदान विसरता येणार नाही - शरद पवार

शरद पवार यांनी पुरंदरेंना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या लिखाणात काही वादग्रस्त मुद्दे होते, मात्र इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याच्या बाबतीतलं त्यांचं योगदान विसरता येणार नाही. इतिहासाच्या क्षेत्रात योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. त्यात एका गोष्टीचं समाधान म्हणता येणार नाही पण ते दीर्घायुषी होते. वयाची शंभरी ही यशस्वीपणे आणि सतत लोकांशी सुसंवाद ठेवत पार पाडली.
त्यांना लोकांच्या सदिच्छा मिळाल्या असं मला वाटतं. ते आज आपल्यात नाहीत. त्यामुळे त्याबद्दलचं दुःख अनेकांच्या मनात आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्तसुद्धा मुद्दे होते. पण त्यासंबंधीचं भाष्य करण्यासाठी मी जाणकार नाही. कुणीही काहीही मोठी कामगिरी करत आयुष्य खर्च केल्यानंतर काही लोक त्यामध्ये उणिवा लोक काढत असतात, हे बाबासाहेबांच्या बाबतीतही केले गेले. इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याचं योगदान विसरता येणार नाही”.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा