नरिमन पॉईंट - बिल्डरांना फायदा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरए योजनेतील काही योजनांना 4 एफएसआय दिल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हण यांनी केला आहे. तसेच मुंबईच्या मोक्याच्या जागा बिल्डरांना देण्याचा घाट भाजपाच्या सरकारने घातला आहे. त्याचबरोबर मुंबईची आज जी दुर्दशा झाली आहे त्याला फक्त आणि फक्त शिवसेना जबाबदार असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
एकाच पक्षाची सत्ता असताना राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेत समन्वय नाही, मागील वचननाम्यामध्ये जी आश्वासनं दिलीत ती पूर्ण झालेली नाहीत असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना यूपीएच्या सरकारची स्तुती करत आहे. आमचे सरकार चांगले होते. आम्हाला शिवसेनेच्या सर्टीफिकेटची गरज नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी देखील शिवसेना आणि भाजपावर जोरदार टीका केली.
शिवसेना म्हणते की भाजपा गुंडांची पार्टी आहे तर भाजपा म्हणते की शिवसेना हफ्ताखोर पार्टी आहे. मग अशा परिस्थितीमध्येही दोन्ही पक्ष मांडीला मांडी लावून राज्यात आणि केंद्रात कसे बसतात? कॉग्रेसची सत्ता मुंबई महापालिकेवर आली तर भ्रष्टाचारात जो सामील आहे त्यांना जेलमध्ये पाठविले जाणार असल्याचे सांगत संजय निरूपम यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली.