Advertisement

विधान परिषदेची ब्याद नकोच, राजू शेट्टींनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली?

स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील आमदारकीचा प्रस्ताव स्वीकारून दोन दिवस होत नाहीत, तोच नको ती विधान परिषदेची ब्याद, असं म्हणत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधान परिषदेची ब्याद नकोच, राजू शेट्टींनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली?
SHARES

स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील आमदारकीचा प्रस्ताव स्वीकारून दोन दिवस होत नाहीत, तोच नको ती विधान परिषदेची ब्याद, असं म्हणत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संघटनेतील काही नेत्यांनी या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने आपापसांत वाद नको ही भूमिका (raju shetti denies to contest maharashtra legislative council election from ncp quota) राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून मांडली आहे.  

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी लिहिलं आहे की, राज्यपालांच्या कोट्यातून ज्या १२ जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत, त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्वीकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असं आघाडीच्या नेत्यांचं मत होतं. 

आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितलं. जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असं सुचवलं. १२ जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक, पक्षाचे अध्यक्ष जालंधर पाटील यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचं मत आजमावलं गेलं आणि एकमताने आघाडीचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरलं. माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिकाऱ्यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणीवपूर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यानावाबाबत एकमत केलं व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितलं.

हेही वाचा - राजू शेट्टींचं ठरलं, होणार राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार

तो निरोप घेऊन मी १६ जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार साहेब यांना पक्षाचे सचिव डाॅ.महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला. आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या २५ वर्षामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात. 

स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच... शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही. स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ ऊभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असं वाटतं. याबाबतीत कोणीही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा