सध्या देशात राम मंदिरासह विविध महापुरूषांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरू अाहे. असं असताना आपल्या अनोख्या शैलीने नेहमीचं सर्वांचं लक्ष वेधून घेणारे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मंदिर आणि पुतळे बांधण्यामागील राजकीय पक्षांची व्यथा उघडपणे बोलून दाखवली. देशात मंदिर आणि पुतळे बांधले नाहीत, तर कुठल्याही राजकीय पक्षाला मतं मिळणार नाही असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे. खोपाली इथं पत्रकारांसोबत संवाद साधताना आठवले यांनी हे मत व्यक्त केलं.
मंदिर आणि पुतळे बांधून विकास होतो का?, या प्रश्नावर उत्तर देताना आठवले म्हणाले की, ''मंदिर आणि पुतळे बांधली नाहीत तर राजकीय पक्षांना मतं मिळणार नाहीत. एवढंच नाही, तर प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला तरी इंदू मिलमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होणार. अयोध्येत राम मंदिर व्हावं, ही कोट्यवधी जनतेची इच्छा आहे. परंतु ही इच्छा पूर्ण होण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत वाट बघावी लागेल. कारण राम मंदिर बांधताना मुस्लीम समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणं अावश्यक आहे.'', असं त्यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणावर मत मांडताना आठवले म्हणाले की, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देण्यात आल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणाच्या बाजूने न्यायालयात लढण्यासाठी वकीलांची फौज उभी करू असंही, सरकारचं म्हणणं आहे. पण हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजात मागासांची मोठी संख्या आहे. त्यावर कदाचित हा मुद्दा उच्च न्यायालयात टिकेल. परंतु टक्केवारीचा विचार करता सुप्रीम कोर्टात हा मुद्दा टिकणार नाही. त्यामुळे देशात ७५ टक्के आरक्षणाचा कायदा केल्यावरच आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे, असंही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युतीबाबत ते म्हणाले की ही युती काँग्रेसची मतं खाईल. त्याचा फायदा भाजपाला होईल.
हेही वाचा-
मलबार हिल नव्हे रामनगरी? मामांची मलबारहिलच्या नामांतराची मागणी
दादरच्या 'नामांतरा'ऐवजी आंबेडकरांचे विचार आत्मसात करा, प्रकाश आंबेडकरांनी भीम आर्मीला सुनावलं