मतदारांनी यंदा आम्हाला दिलेला कौल बघून आमची झोप उडाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत देशात भाजपाने निर्विवाद यश मिळवलं असून राज्यातही युतीला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.
निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पुन्हा एकदा देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. मागील वेळी मोदींची लाट होती. यंदा मात्र मोदींची त्सुनामी आली आहे. मतदारांनी दिलेला कौल बघून आमची झोप उडाली असून आता आमची जबाबदारी वाढली आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र तरीही जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. जनतेचा हा कौल पाहिल्यावर आता पुन्हा आम्ही कामाला सुरूवात करणार आहोत. या विजयाबद्दल सहकार पक्षांसह जनतेचेही आभार मानतो. महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी विजयासाठी प्रयत्न केले. रामदास आठवले यांचे तर विशेष आभार मानतो. कारण त्यांच्या पक्षाचा उमेदवार नसतानाही त्यांनी सभा घेतल्या.