मुंबईला (mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणापैकी तानसा धरण एक आहे. धरण क्षेत्र परिसरात प्रवेश बंदी असूनही बेकायदा प्रवेश रोखण्यासाठी आता धरण (dam) परिसरात फेन्सिंग बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
यासाठी पालिका प्रशासन तब्बल 26 लाख 50 हजार 253 रुपये खर्च करणार आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा (Tansa), तुळशी व विहार या सात धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करणे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे.
धरण परिसर हा अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा पाणीपुरवठा स्त्रोत असल्याने अनधिकृत प्रवेश रोखणे आणि कठोर सुरक्षा करणे यासाठी सुरक्षेसंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येतात.
तसेच त्याचाच एक भाग म्हणजे धरण परिसरातील संवेदनशील ठिकाणी मजबूत फेन्सिंग उभारण्यात येत आहे. फेन्सिंगसाठी गंजरोधक कोटिंग केलेल्या लोखंडी जाळीचा वापर करण्यात येत आहे. तसेच ती जाळी सिमेंट काँक्रीट खांबांवर बसवली जात आहे.
यामुळे वन्यप्राण्यांची तसेच अनधिकृत व्यक्तींची ये-जा रोखण्यास मदत होणार आहे, असे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
धरण परिसरात सुरक्षेचे नियम अधिक कडक करण्यात आले आहे. फेन्सिंग पूर्ण झाल्यानंतर नियमित देखभाल व तपासणी केली जाणार आहे.
हेही वाचा
