Advertisement

लेखण्या मोडा, बंदुका घ्या !


लेखण्या मोडा, बंदुका घ्या !
SHARES

`लेखण्या मोडा, बंदुका घ्या...` आठवतंय ना कोण म्हणालं होतं ते? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जहाल लेखणीतून उतरलेलं हे वाक्य आज समस्त पत्रकारांना लागू पडतंय, असंच म्हणावं लागेल.

पत्रकार कोणत्याही विचारसरणीचा असला तरी त्याच्या लिखाणाचा अधिकार कोणीच नाकारू शकत नाही. किमान, लोकशाहीत तरी हा हक्क अबाधित राहणे गरजेचे आहे. परंतु, गेल्या काही काळापासून पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि हत्यांचे आकडे पाहता स्वातंत्र्यवीरच काय पण अत्र्यांपासून तमाम आक्रमक पत्रकारांची लेखणीही कदाचित आज हेच म्हणाली असती.

विचारांना विचारांनीच उत्तर देण्याची प्रथा आपण जोपासतो तर खरं. पण आता वैचारिक कुपोषणाच्या काळात पत्रकारिताही तथाकथित विशिष्ट विचारसरण्यांनी ग्रासलीये, हेही तितकंच खरंय. त्याचाच परिपाक म्हणा किंवा आणि काहीही म्हणूयात, पण हल्ले आणि हत्यांच्या रुपात ज्या काही घटना समोर येऊ लागल्या आहेत. अर्थात, त्या निश्चितच लांच्छनास्पद आहेत, पण त्याला जबाबदार जसे सरकार, कायदा-सुव्यवस्था वगैरे वगैरे आहेत तसेच आपणही आहोत, हेही लक्षात घेतलेले बरे.

पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रयत्न कुणी विशिष्ट विचारसरणीचे लोकच करताहेत असं अजिबात नाही. उलट, गैरप्रकार करणाऱ्यांना कायमच तत्व जपणाऱ्या पत्रकारांचा, समाजसेवकांचा, माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा त्रास होत आला आहे. आणि, त्यातूनच पत्रकारांच्या किंवा तत्सम आडवे येणाऱ्या लोकांच्या हत्यांच्या घटना घडत आल्या आहेत आणि यापुढेही घडणार आहेत. (यात काहींच्या दुकानदारीमुळे बदनामीची झालर चढलीच आहे आणि मुख्यमंत्रीही थेट दुकानदारीचा उल्लेख करण्यापर्यंत धजावू लागले आहेत.) म्हणून, घाबरून जाऊन पत्रकारितेत येणाऱ्यांची संख्या कमी झालीये का? तर नाही. उलट, आज पत्रकारितेचा बाजार करण्यात याच बेसुमार संख्येला जबाबदार धरले जात आहे.

सध्या गौरी लंकेशांच्या हत्येमुळे समाजातलं वातावरण ढवळायचा प्रयत्न होतोय. परंतु, यातून गौरी लंकेशांच्या खऱ्या पत्रकार आत्म्यालाही यातनाच होत असतील. कारणं शोधण्यापूर्वीच निकाल लावणारे तथाकथित स्वयंघोषित विद्वान (सर्व बाजूंचे – डावे, उजवे, मधले वगैरे सर्वच) जोपर्यंत आहेत तोपर्यंत खऱ्या (तटस्थ) पत्रकारितेला `अच्छे दिन` येणारच नाहीत.

पुराव्याशिवाय बातम्या न देणारे, ऑफ द रेकॉर्ड माहितीला स्वतःजवळच ठेवणारे, बातमी देताना दोन्ही बाजूंना स्थान देण्यासाठी धडपडणारे पत्रकार आता हाताच्या बोटावरच मोजायचे का? जर, आजच्या पत्रकारितेची ही अवस्था असेल तर त्याला कारणीभूत कोण, म्हणून कंठशोष करणारेही कमी नाहीत. मालकावर खापर फोडायचे आणि स्वतः मात्र वाट्टेल ते धंदे करायचे, हे कोणत्या तत्वात बसतं?

आता गौरी लंकेशांचं लिखाण वाचलेले देशभरात किती असतील हे देवच जाणे. परंतु, त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरणाऱ्यांपैकी किती जणांनी त्यांच्याबद्दल खरी माहिती घेतली असेल, हेही सांगता येणार नाही. उगाच, व्हॉट्सएपवर, फेसबुकवर वाचून मतं बनवणारी मेंढरं बरीच झाली आहेत. त्यांचे कळपही (ग्रुप्स) एकमेकांवर चिखलफेक करत दिवसभरात टाइमपासचा रतीब ओतत असतात. परंतु, त्यांच्यापैकी किती जणांना खरोखरच या प्रकरणाबाबत खरी आत्मीयता आहे?

केवळ कुणाच्या तरी आडनावावरून जात ठरवणारे, प्रांतावरून मानसिकता ठरवणारे आणि बोलण्यावरून विचारसरणी ठरवणाऱ्यांनी आता पोपटपंची बंद करावी. सर्वसामान्य लोकांना आता मीडियाबाबत तिटकारा वाटू लागलाय, हे समजून घ्या आणि पत्रकारितेला खरोखरच चांगले दिवस आणण्याच्या दृष्टीने काम करा.

गौरी लंकेशांच्या निमित्ताने पुन्हा एकदा पत्रकार हे सर्वात सोपे टार्गेट असल्याचे समोर आले आहे. समाजाचे लक्ष कुठेतरी कसे वळवायचे हे धनशक्ती, दंडशक्ती असणाऱ्यांना चांगलेच कळते. पत्रकारांच्या संघटनांमधली धुसफूस, एकमेकांविषयीचे हेत्वारोप, दुःस्वास अशा स्वरुपात असणाऱ्या दुफळीचा फायदा हा त्यांना नेहमीच मिळत आलाय आणि भविष्यातही मिळेल.

विचार करा, पत्रकारांनी खरंच पत्रकारितेला न्याय देण्यासाठी हातात हात घेतले तर? विचारसरणीपेक्षा लोकांच्या प्रश्नांसाठी बातमी आणि लेखांना पुरावे तसेच अभ्यासाचे दाखले देत केलेल्या पत्रकारितेला कुणीच कधीच दडपू शकणार नाही. परंतु, आज रेडिमेड बातम्या, लेखांच्या आणि वेळेच्या स्पर्धेत पत्रकारिता विश्वासार्हताच गमावून बसतेय की काय, अशी भीती वाटू लागलीये. आता बुरसटलेली, विचारसरण्यांना बांधलेली, तत्त्वहीन वाकलेली, मोडलेली लेखणी मोडा आणि संगणकयुगातील पेपरलेस जर्नालिझमला शोभेल अशी `कळ`लावी पण, लोकांना विश्वास वाटणारी जहाल पत्रकारिता करण्याची वेळ आलीेये!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा