कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अपेक्षेनुसार स्वत:ची शेतकरी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ सप्टेंबरला घटस्थापनेच्या दिवशी सदाभाऊ आपल्या पक्षाचं नाव जाहीर करणार असून दसऱ्याला इचलकरंजी येथे मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सदाभाऊंची काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आली होती.
मुंबईतील शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदाभाऊंनी ही माहिती दिली. आमची संघटना शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि युवकांची असेल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आम्हाला रस आहे. संवादाच्या माध्यमातून आम्ही ते सोडवू. त्यासाठी १६ पदाधिकाऱ्यांची एक समिती नेमण्यात येईल. ही समिती शेतकरी तसेच शेतमजुरांसाठी कृती कार्यक्रम तयार करेल, असं सदाभाऊंनी स्पष्ट केलं.
आपले जुने सहकारी राजू शेट्टींवर जोरदार टीका करताना राजकारणात दोस्तीला महत्त्व असत नाही. मी जर सरकारचा हस्तक होतो. तर सरकारशी युती कोणी केली? माझ्या फक्त राजीनाम्यातच त्यांना रस आहे. मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण तुम्ही खासदारकीची राजीनामा द्यायला तयार आहात का? तुम्ही स्वत: सातत्याने तुम्ही भूमिका बदलत आहात. त्यामुळं तुमची आघाडी कुणासोबत आहे, हे मला कळू शकलेलं नाही, असं सदाभाऊ म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीसाठी चर्चेला येण्याचे निमंत्रण देऊनही शेट्टी चर्चेला आले नाहीत, कारण आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो की काय अशी भीती त्यांना वाटू लागली. म्हणूनच त्यांनी आत्मक्लेश यात्रा काढली. पण ही यात्रा आत्मक्लेश यात्रा नव्हती, तर सदाभाऊ क्लेश यात्रा होती.
शेतकरी चळवळीत मी ३३ वर्षे काम केलं आहे. तत्कालिन भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी लाठ्याकाठ्याही खाल्ल्या आहेत. कर्जमुक्तीच्या सर्व प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाची तमा न बाळगता सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. कृषी राज्यमंत्री म्हणून मी त्यासाठी सरकारसोबत प्रयत्न केले. या दरम्यान माझ्यावर झालेले आरोपही मी सहन केले. तरीही मला शाबासकी द्यायचे सोडून माझे पाय कापण्याचे काम झाले, असं सदाभाऊंनी स्पष्ट केलं.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)