Advertisement

गुड न्यूज! रेस्टाॅरंट लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.

गुड न्यूज! रेस्टाॅरंट लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत
SHARES

मागील ६ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील रेस्टाॅरंट सर्वसामान्य खवय्यांसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. (SOP ready to start restaurant in maharashtra says cm uddhav thackeray)

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् इत्यादी) १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास संमती दिली होती.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटतं. आर्थिक बाबींसाठी आपण जबाबदारीने पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते एकेक सुरु करत आहोत. काही व्यवहार बंद ठेवल्याने कर रुपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणं बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची शासनाला जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचं भान ठेवून व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे.

हेही वाचा- राज्यातील हाॅटेल, रिसाॅर्ट्स १०० टक्के क्षमतेने सुरू

जबाबदारी तुमचीही…

राज्य शासन ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान राबवत आहे. अवघा महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे, तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

जीवनशैलीत बदल आवश्यक

रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यांनी मास्क लावणं, हात धुणं गरजेचं आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मार्गदर्शक तत्वे अंतिम करा

एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणं ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. सर्व संबंधितांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू, असं गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितलं.

बैठकीला पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलिप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के.भाटीया आदी उपस्थित होते.

हेही वाचा- मस्तच! सिंधुदुर्गात उभं राहणार ताजचं फाईव्हस्टार हाॅटेल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा