मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र शुक्रवारी संजय निरुपम यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून संजय निरुपम याना दणका दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता संजय निरुपम यांच्यावर मनसेकडून जोरदार टीका होत आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'संजय निरुपम हे तर तोंडावर आपटले' असा घणाघात केला आहे.
याबाबत मुंबई लाइव्हशी बोलताना मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'हा मुंबईकरांचा विजय' असल्याची प्रतिक्रिया देत 'सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर निरुपम तोंडावर आपटले' असेही ते म्हणाले.
संजय निरुपम यांच्याशी संपर्क केला असता 'मी माझ्या वकिलांशी बोलूनच प्रतिक्रिया देईन' अशी माहिती मुंबई लाइव्हला दिली. दरम्यान गुरुवारी संजय निरुपम यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि निष्णात वकील कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टात फेरीवाल्यांची बाजू मांडणार असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले होते.
फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात दाद मागणाऱ्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना हायकोर्टाने दणका दिला होता. मुंबईत कुठेही फेरीवाल्यांना धंदा करू देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली होती. याव्यतिरिक्त, मुंबईत फेरीवाल्यांना निर्धारीत फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्यास परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, हॉस्पिटलच्या १०० मीटरच्या आवारात फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली होती.
रेल्वे स्टेशन, पालिका मंडईच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर रेल्वे पादचारी पूल, स्काय वॉकवरदेखील फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.