मुंबई - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेत बदल नाही. जी काल होती तीच आजही आहे अशी प्रतिक्रीया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना ब्लॅकलिस्ट करणे योग्य नाही. तसेच मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण केली गेली, मग मुख्यमंत्र्याना ब्लॅकलिस्ट करणार का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. खासदाराचे वर्तन हे शिस्त पालन समिती पुढे जाईल. ते चुकले असतील तर त्यांना शिक्षा होईल. पण विमान कंपन्यांंची भूमिका ही हुकूमशाही पद्धतीची आहे. या प्रकरणावरून जे राजकारण आणि दबावतंत्र सुरु आहे ते योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. एअर इंडियाच्या कारभाराबद्दलही चौकशी व्हावी, अशी त्यांनी मागणी केली. तसेच संसदेने या प्रकरणात चौकशीसाठी एखादी समिती नेमावी असंही त्यांनी सांगितलं. काॅ. श्रीपाद डांगे यांच्या आयुष्यावर पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंसहीत मनोहर जोशी आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांच्याबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.