रिझर्व्ह बँके (RBI)चे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी सोमवारी रात्री तडकाफडकी दिलेला राजीनामा आणि ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला बसलेला धक्का यामुळे मुंबई शेअर बाजारा (BSE)चा सेन्सेक्स ३५० अंकांनी गडगडला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत फटका बसल्याने तसंच आरबीआच्या प्रमुखपदी नवीन व्यक्तीची निवड होईपर्यंत शेअर बाजारात अस्थिरता कायम राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शेअर बाजारात घसरण होईल, असा तज्ञांना अंदाज होताच. त्यानुसार मुंबई बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारी सकाळी १५० अंकांच्या घसरणीसह सुरू झाला.
त्यानंतर मध्यप्रदेश ,राजस्थान आणि छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम अशा ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील मजमोजणीचा कल एकापाठोपाठ येऊ लागताच सेन्सेक्समधील घसरण ५०० अंकांपर्यंत पोहोचली. सत्ताधारी भाजपाला या निवडणुकीत अनपेक्षितरित्या पराभवाचा धक्का बसल्याने शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर शेअर बाजाराने काही प्रमाणात स्वत:ला सावरलं.
सद्यस्थितीत सेन्सेक्स ३५० अंकांच्या घसरणीसह ३४,६०० अंकांवर व्यवसाय करत आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजारा (NSE)चा निर्देशांक निफ्टी १०० अंकांनी घसरून १०,४०० अंकांवर व्यवसाय करत आहे.
मंगळवारी रुपयाची सुरूवात देखील मोठ्या घसरणीसह झाली. सुरूवातीच्या सत्रात डाॅलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी कमकुवत होऊन ७२.४२ च्या स्तरावर सुरू झाला. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावरही पडल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.