घाटकोपर – सक्षम महिला स्वराज्य प्रतिष्ठानच्या लोकार्पण सोहळ्याची शनिवारी समता कॉलनी, पंतनगरमध्ये सांगता झाली. या सोहळ्यास प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ होत्या. सिंधुताई अर्थात माईंनी या वेळी महिलांना सक्षम होण्याचा संदेश दिला.
या वेळी एका मार्गदर्शन पुस्तिकेचंही प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तिकेतून महिलांना सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलंय. यापुढे प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांसाठी रोजगार, शैक्षणिक, वैद्यकीय, कायदेविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात येतील. गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सक्षम महिला स्वराज्य प्रतिष्ठान महिलांना सुर्वणसंधी उपलब्ध करून देणार आहे.
या वेळी माईंनी त्यांच्या आयुष्याला उजाळा देताना सांगितलं की, 'प्रत्येक महिला सक्षम असते. निर्भिडपणे संकटांचा सामना केला की, संकट आपसूक लहान होतं. फुलांवरून चालतानासुद्धा काटा पायात लागतो. तो काटा लागल्यानंतर वेदना सोसण्याची हिंमत ही ठेवावीच लागते. मग त्या काट्यांनी होणारी वेदना हळूहळू कमी होत जाते.'