संपूर्ण क्रिकेट जगताला हदरवून टाकणाऱ्या पिच फिक्सिंग प्रकरणामुळे आता पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर याच नावाची चर्चा आहे. पांडुरंग साळगावकर यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडले असून काही तासांतच साळगावकर यांचे निलंबन बीसीसीआयने केले आहे.
पांडुरंग साळगावकर यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1949 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला. पिच क्युरेटर साळगावकर हे माजी रणजीपटू असून जलदगती गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. 1971-72 ते 1981-82 या दरम्यान साळगावकर यांनी महाराष्ट्रासाठी रणजी सामने खेळले आहेत. इराणी कपमध्ये त्यांनी रेस्ट ऑफ इंडियासाठी बॉम्बेविरोधात सामने खेळले आहे. तर पदार्पणाच्या रणजी सामन्यांमध्ये त्यांनी 15 विकेट्स घेतल्या होत्या.
वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साळगावकर यांनी 1972-73 च्या इराणी ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करत सहा विकेट घेतल्या होत्या. त्यात त्यांनी भारतीय कर्णधार अजित वाडेकर यांना दोनदा बाद केले होते. तर त्यानंतरच्या मुंबई विरूद्धच्या रणजी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना त्यांनी सुनील गावस्कर यांनचीही विकेट घेतली होती.
पांडुरंग साळगावकर यांनी निवृत्तीनंतर पुण्यात स्वत:ची क्रिकेट कोचिंग अकादमी सुरू केली आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमचे मुख्य पिच क्युरेटर म्हणूनही ते काम पाहतात.
साळगावकर यांनी रणजीसह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणीमध्ये 63 सामन्यांमध्ये साळगावकरांनी 214 विकेट घेतल्या आहेत. त्यांच्या नावावर 1039 धावा असून त्यांची 103 धावांची खेळी ही विशेष उल्लेखनीय ठरली होती. एका डावामध्ये पाच विकेट घेण्याची कामगिरी 11 वेळा त्यांनी केली आहे.