जवळपास ४० वर्षांची वाटचाल आणि ४०० हून अधिक प्रयोग, अशी नेत्रदीपक कामगिरी केल्यानंतर २०१० मध्ये बंद पडलेलं सतिश आळेकर यांचं ‘महानिर्वाण’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर अवतरणार आहे. सप्टेंबर महिन्यात एनसीपीएमध्ये या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
एनएसडीने आग्रह केल्याने ‘थिएटर ऑलिम्पिक्स २०१८’साठी हे नाटक पुनरुज्जीवित करण्यात आलं आहे. अशातच ‘विनोद दोशी फेस्टिव्हलने’ही या नाटकाबाबत विचारणा केल्याने आळेकरांनी त्यांच्या जुन्या कलावंतांच्या संचाला पुन्हा नाटक करण्याबाबत विचारणा केली. मात्र, आता हे नाटक नव्या तरुण कलाकारांना घेऊन करावं म्हणजे नाटकात एक नवी ऊर्जा मिळू शकेल, असा सल्ला त्यांना मिळाला. त्यामुळे आता नव्या संचात ‘महानिर्वाण’ हे नाटक बसवण्यात आलं.
हे नाटक एनसीपीए प्रेझेंटनशतर्फे सादर होणार आहे. इंग्रजी आणि भारतातील इतर प्रादेशिक भाषांमधील उच्च आंतरराष्ट्रीय कलात्मक आणि तांत्रिक दर्जाचे रंगमंचीय सादरीकरण करणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचा हा उपक्रम आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या, वैविध्य आणि विविध प्रकारची संस्कृती सादर करणाऱ्या निर्मिती संस्थांना सातत्याने भेट देऊन हा निर्मिती उपक्रम जोपासला जात आहे.
चाळीतील एका मध्यमवर्गीय इसमाच्या मृत्यूनंतरच्या घटनांवर हे नाटक आधारित आहे. रडणारी बायको, मृत व्यक्तीच्या मुलाच्या येण्याची वाट पाहणं, इथं तिथं नाक खुपसणारे नातेवाईक आणि शेजारीपाजारी, ज्यांच्यासाठी मृत्यू हा फक्त विनोद करण्यासाठीचा आणखी एक प्रसंग आहे अशा व्यक्तिरेखा यात चितारल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय समाजाचा दुटप्पीपणाही यात अधोरेखित करण्यात आला आहे.
या नाटकातील आताच्या काळातील संदर्भ स्पष्ट करताना आळेकर म्हणाले, खरं सांगायचं तर मी हाच प्रश्न माझ्या कलाकारांना विचारला होता. कारण मलाच त्याची शाश्वती वाटत नव्हती. हे तरुण उच्चवर्गीय उपनगरात आधुनिक जीवनपद्धती जगत आहेत. हे नाटक पुण्यातील ज्या चाळीत घडतं तसं त्यांनी काही पाहिलेलंही नाही. चाळींमध्ये शेजारी हा आपल्या आयुष्याचा भाग असतात. प्रत्यक्ष संदर्भ आणि परिस्थिती बदलली असली तरी मानवजातीच्या सुप्त इच्छा, त्यांच्यातील मूळ स्वभाव हा थोड्याफार फरकाने तोच राहतो, हे मला ठाऊक आहे.
‘महानिर्वाण’ हे नाटक भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील एक मानाचा टप्पा मानलं जातं. १९७४ मध्ये झालेल्या पहिल्या प्रयोगापासून पुढे सुमारे ४०० प्रयोगांमध्ये हे नाटक उत्कृष्ट कलाकृतीचा एक नमुना मानलं गेलं. या नाटकाची मूळ संकल्पना सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीशी इतकी सुसंगत आहे की, हे नाटक देशभरातील १० भाषांमध्ये सादर झालं आहे. ‘महानिर्वाण’ या नाटकाचा समावेष विद्यापीठाच्या साहित्य अभ्यासक्रमातही करण्यात आला आहे.
दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांचं संगीत या नाटकाला लाभलं आहे. नचिकेत देवस्थळी, सायली पाठक, सिद्धार्थ महाबळ, मयुरेश्वर काळे, भक्तीप्रसाद देशमाने, भूषण मेहेरे, चिन्मय पटवर्धन, संदेश कुलकर्णी, वरद साळवेकर, निनाद गोरे, सौरभ शाळीग्राम, रोहीत पेटकर, केतन विसाळ आणि सुमीत मधूर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
हेही वाचा -