दिवाळीत शाळकरी मुलांची सुट्टी आणि कार्यालयांना असलेल्या सलग सुट्टयांमुळे अनेक मुंबईकर कुटुंबासह खरेदीसाठी किंवा नातेवाईकांच्या घरी जातात. अचानक वाढलेल्या या प्रवासी संख्येमुळे रेल्वेसह बेस्टवरही बराच ताण पडतो. ही बाब लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनानं दिवाळीत १५४ जादा गाडया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबरदरम्यान १८ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
वीर कोतवाल उद्यान-प्लाझा सिनेमा, दादर, वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, एपीएमसी मार्केट, वाशी या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन या गाडयांचं नियोजन करण्यात आलं आहे. तसचं ९ नोव्हेंबर रोजी भाऊबीज सणानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी मुंबईसह, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात १३६ जादा गाडया सोडण्याचा निर्णयही बेस्ट प्रशासनाद्वारे घेण्यात आला आहे.
मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरे, मीरा रोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे), रेतीबंदर कळवा शिवाय वाशी, कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली गाव, सीबीडी बेलापूर आदी ठिकाणी विशेष जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. त्याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मदतीसाठी गर्दीच्या बसथांब्यांवर बस निरीक्षकांची तसेच वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
हेही वाचा -
भारतात धावणार पहिली इंजिन नसलेली ट्रेन
दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द