हातावर क्वारंटाइन ( Quarantine)चा शिक्का असलेल्या सहा जणांनी सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून खाली उतरवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रवासी सिंगपूरहून मुंबईत आले होते. नंतर ते सगळे मुंबई सेंट्रलहून सौराष्ट्र एक्स्प्रेसनं बडोदा जाण्यासाठी निघाले होते. गाडी बोरीवली स्टेशनवर पोहोचताच त्यांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आलं.
मिळालेली माहिती अशी की, हातावर कोरोनाचा शिक्का असतानाही विलगीकरण कक्षात राहण्याऐवजी हे प्रवासी ट्रेननं बिनधास्त प्रवास करत होते. या संशयितांना तात्काळ ट्रेनमधून उतरवण्यात आलं आहे. बी-१ आणि बी- २ या बोगीमधून ते प्रवास करत होते.
कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण कुणाच्याही संपर्कात येऊ नये यासाठी राज्य सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यापैकीच एक योजना म्हणजे रुग्णांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येत आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची एअरपोर्टवरच तपासणी केली जात आहे. संशयित आढळून आल्यास अशा विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. तर काहींना घरी क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
पण या सल्ल्याकडे अनेक जण दुर्लक्ष करत आहेत. बुधवारी देखील चौघं तरूण गरीब रथ एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्यांच्या हातावर देखील क्वारंटाईनचा स्टँप होता. टिसीच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांना पालघरला उतरवण्यात आलं होतं.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे देशासह महाराष्ट्रातीस जनजीवनावर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम मुंबईतील दादर, माहीम आणि धारावी भागातील दुकानं बंद करण्यात आली आहेत. राज्य सरकारनं नागरिकांना अनावश्यक बाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र तरी देखील नागरिकांचा समिश्र प्रतिसाद पाहून अखेर सरकारनं काही अंशत: मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याला मुंबईकर कसा प्रतिसाद देत आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -