Advertisement

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी एसटीच्या ५००० विशेष बस धावणार

एसटी महामंडळाने पंढरपूर यात्रेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी घेतला.

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी एसटीच्या ५००० विशेष बस धावणार
SHARES

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेकरिता एसटी महामंडळाने वारकऱ्यांसाठी राज्यभरातून पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाने पंढरपूर यात्रेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी घेतला. त्यावेळी त्यांनी वारीसाठी पाच हजार विशेष बस सोडण्याचे निर्देश दिले.

याव्यतिरिक्त वाखरी येथील २७ जूनला होणाऱ्या माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २०० अतिरिक्त बसही उपलब्ध केल्या जाणार आहेत.

विशेष एसटी गाड्या २५ जून ते ५ जुलै यादरम्यान धावणार आहेत.

भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे; तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूप घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे पाच हजार गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीतर्फे करण्यात आले आहे.

मराठवाड्यातून १२००, मुंबईतून ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १०००; तर अमरावती येथून ७०० विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

भाविकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, आयटीआय महाविद्यालय आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

यात्राकाळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालये, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. 



हेही वाचा

शिर्डीला जाताय? साई बाबा मंदिरातील नवीन नियम जाणून घ्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा