आज पुन्हा एकदा मुंबईकरांचे हाल झालेत..कारण रिक्षा चालकांनी आजपासून संप पुकारलाय..अवैध प्रवासी वाहतुकीला सरकारने त्वरित लगाम लावावा; या मुख्य मागणीसाठी मुंबई ऑटोमेन्स युनियनने आज एक दिवसाचा संप पुकारला.तसंच 1 लाख 4 हजार रिक्षाचालक संपावर गेले आहेत.त्यामुळे सकाळपासून घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. तसंच ऑटोमेन्स युनियनने पुकारलेला संप यशस्वी झाल्याचा दावा युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना केला. ओला, उबेर टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतुक केली जात आहे. तसेच खासगी बस, कॉलसेंटरच्या बसमधूनही अवैध प्रवासी वाहतूक होत असून याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका रिक्षा चालकांना बसत असल्याचं म्हणत युनियनने संप पुकारला आहे. तर दुसरीकडे ऑटोमेन्स युनियनच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. वांद्रे पूर्व-पश्चिम स्थानक, खार स्थानक, अंधेरी स्थानक येथील शेअर रिक्षा बर्यापैकी सुरू असून अन्य ठिकाणीही तुरळक प्रमाणात रिक्षा सुरू आहेत. मात्र राव यांनी संप यशस्वी झाल्याचा दावा करत 1 लाख 4 हजारापैकी 84 हजार रिक्षा बंद असल्याचे स्पष्ट केले आहे.