कोरोनामुळं मुंबईची लाइफलाइन लोकलसेवा बंद ठेवण्यात आली होती. परिणामी लोकलचा संपूर्ण भार बेस्ट बस व एसटीवर आला. त्यामुळं बेस्टन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढत्या गर्दीमुळं सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन होत असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच महिला प्रवाशांना ही धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागत असल्यामुळं तसंच प्रवासादरम्यान अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं असल्याने त्यात महिला प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता लॉकडाऊनपूर्वी सुरू असलेल्या २९ मार्गांवरील महिलांसाठीच्या विशेष बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
मुंबईत २९ मार्गांवर फक्त महिलांसाठी पूर्णवेळ ५५ विशेष बस फेऱ्या सुरू होत्या. या फेऱ्या सुरू करण्यास बेस्ट उपक्रमाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. सध्या बेस्टच्या ३,५०० पैकी ३,३०० गाड्या धावत आहेत. बेस्टच्या मदतीसाठी सुरुवातीला एसटीच्या २०० बस आल्या आहेत. परंतु नियोजन नसल्यानं दिलासा मिळालेला नाही. बेस्टकडून लॉकडाऊनपूर्वी मंत्रालय ते सीएसएमटी, अंधेरी पूर्व ते कन्नमवार नगर, कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे स्थानक पूर्व, गोराई आगार ते सांताक्रूझ, आयसीआयसीआय बँक बीके सी ते वांद्रे टर्मिनस आदी मार्गावर महिला फेऱ्या दिल्या जात होत्या.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यात सध्या ३७ महिला तेजस्विनीपैकी ३१ बसच आल्या आहेत. त्या महिलांसाठी पूर्ण वेळ न चालवता सकाळी व सायंकाळी फक्त गर्दीच्या वेळीच महिलांसाठी चालवल्या जातात. सध्यस्थितीत बेस्टची प्रवासी संख्या १८ लाखांवर ८ जूनला बेस्टची प्रवासी संख्या ४ लाख १९ हजार होती. हीच संख्या आता १८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे.