रेल्वे सुरक्षेसंदर्भातील कुठल्याही तक्रारी असल्यास प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावर उतरून स्टेशन मास्तर किंवा रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्याची गरज उरणार नाही. कारण सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मध्य रेल्वेचं 'रेल सुरक्षा' हे नवीन मोबाइल अॅप लाॅन्च होणार आहे. प्रवासी या अॅपद्वारे रेल्वे सुरक्षेच्या बाबतीत कुठल्याही तक्रार नोंदवू शकतील. महत्त्वाचं म्हणजे अॅपवरील तक्रारींची तात्काळ दखल घेण्यात येईल.
या मोबाइल अॅपला रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) हेल्पलाइन क्रमांक १८२ ला जोडण्यात येईल. यामुळे आरपीएफचे जवान त्वरीत संकटात सापडलेल्या प्रवाशाच्या मदतीला धावून जातील. या अॅपला सर्वात पहिल्यांदा पुण्यात प्रायोगिक तत्वावर सादर करण्यात आलं होतं. या अॅपची २०१६ पासून चाचणी सुरू आहे. चाचणीत यशस्वी ठरल्याने हे अॅप मध्य रेल्वे मार्गावर सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.
या अॅपला गुगल 'प्ले स्टोअर'वरून डाऊनलोड करता येऊ शकतं. प्रवाशाने या अॅपवर तक्रार नोंदवल्यास ही तक्रार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएमएमटी)मधील नियंत्रण कक्षातील हेल्पलाइन क्रमांक १८२ द्वारे ट्रॅक करण्यात येईल. त्यानंतर नियंत्रण कक्षातून नजीकच्या आरपीएफ किंवा रेल्वे पोलिस (जीआरपी)ला कळवण्यात येईल. त्यानंतर संबंधित स्थानकातील जवान त्वरीत प्रवाशाच्या मदतीसाठी धावून जातील.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखालील रेल्वे सुरक्षा समिक्षा बैठकीत या अॅपवर जानेवारीत चर्चा करण्यात आली होती. मधल्या काळात जूनमध्ये गोयल यांनी रेलमॅड आणि मेन्यू या दोन अॅपचं अनावरण केलं. त्यामुळे रेल्वेच्या या नव्या अॅपची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
हेही वाचा-
मुंबईची जीवघेणी लाईफलाईन, जुलैपर्यंत लोकलगर्दीचे 406 बळी
चेंबूर नाक्यावर मोनोरेल पडली बंद, प्रवासी अडकले