मुंबईत एकीकडं कोरोनानं मुंबईला टार्गेट केल्यानं मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. त्याचप्रमाणं येत्या काळात पावसाळा असल्यानं मुंबईरांना पावसाळ्यात आणखी त्रासांची भर पडू नये यासाठी पावसाळापूर्व कामांना सुरूवात करण्यात आली आहे. महापालिकेप्रमाणं मध्य रेल्वेनं देखील पावसाळापूर्व कामांना सुरुवात केली आहे.
पावसाळ्यात लोकलचं वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी विविध कामांना गती दिली जात असून १० जूनपर्यंत ही कामं पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. सध्यस्थितीत पहिल्या टप्प्यात १७० छोट्या-मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत १७० नाल्यांची सफाई करण्यात आली असून दादर, भायखळा, घाटकोपर, सायन, कुर्ला, कळवा, सॅन्डहर्स्ट रोड येथील भूमिगत नाले व गटारांचीही सफाई केल्याचं समजतं.
लॉकडाऊनमुळं मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगारांना स्थलांतर केलं आहे. त्यामुळं १५ टक्के मनुष्यबळातच पावसाळापूर्व कामं पूर्ण केली जात असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली. मध्य रेल्वेलाही मनुष्यबळाची कमतरता भासत असली तरीही आहे त्या मनुष्यबळातही कामं उरकली जात आहेत. नालेसफाई, रुळांची उंची वाढवणं यासह अन्य कामं हाती घेण्यात आली आहेत. रेल्वे रुळांलगतच असलेल्या झाडांच्या फांद्यांचीही छाटणी केली असून ८०० फांद्या छाटण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या असलेल्या कुर्ला, टिळक नगर येथील नाल्याची रुंदी वाढवण्याचेही काम हाती घेतलं आहे.
पादचारी पूल आणि उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची थांबलेली कामे पाहता यातील काही महत्त्वाची कामंही हाती घेण्यात आली आहेत. कल्याण ते शहाड दरम्यान वालधुनी नदीवर असलेल्या पुलाचंही काम करताना याचे गर्डर बदलण्यात आले. वसईजवळील रेल्वेच्या उड्डाणपुलाचीही दुरुस्ती करण्यात आली. तसंच, कोपर पुलाचेही काम हाती घेण्यात आलं आहे.
हेही वाचा -
कोरोनाच्या प्रत्येक मृतदेहामागे कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता
धारावी, माहीम आणि दादरमध्ये ६३ नवे करोनाग्रस्त