Advertisement

कोरोनामुळं कामगारांची कामाकडे पाठ; रेल्वे प्रशासनाला मोठा फटका


कोरोनामुळं कामगारांची कामाकडे पाठ; रेल्वे प्रशासनाला मोठा फटका
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं अनेकांनी घरी राहणं पसंत केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या घरी राहण्याच्या या निर्णयामुळं अनेक कंपन्या, खाजगी कार्यालयं यांना फटका बसला आहे. अशातच आता रेल्वेमध्ये ही अशी परिस्थिती असल्याची माहिती समोर येत आहे. लॉकडाऊनमुळं आर्थिक स्थिती गंभीर आणि कोरोनाच्या भीतीमुळे लाखो कामगारांनी परप्रांतातील आपल्या गावचा रस्ता धरल्याचा फटका ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’च्या (एमआरव्हीसी) विकासकामांना बसत आहे.

अनेक ठिकाणी मनुष्यबळाअभावी रेल्वेची कामे रेंगाळली आहेत. लॉकडाऊनमध्ये ठाणे ते दिवा पाचवा सहावा मार्ग आणि १२ स्थानकांतील पादचारी पुलांच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न रेल्वेने केला. मात्र हे प्रकल्प अवघ्या २२० कामगारांच्या जीवावर केलं जात असल्यानं त्यांची गती मंदावली आहे. मागील १० वर्षांपासून ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग मिळून मध्य रेल्वेचे लोकल वेळापत्रक सुधारण्यास मदत मिळणार आहे.

मात्र, या कामाच्यामधी आलेल्या अनेक अडथळ्यांमुळे या प्रकल्पाला गती मिळालेली नाही. एमआरव्हीसीकडून गेल्या ६ महिन्यांत कामाला गती दिली गेली. त्यात कोरोनामुळं लॉकडाऊन लागु करण्यात आलं. त्यामुळं या प्रकल्पावर काम करत असलेल्या कामगार, मजुरांनी परराज्याची वाट धरली. परिणामी प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे.

पावसाळ्यात मोठी कामे हाती घेतली जात नाहीत, तर छोटी व किरकोळ कामे करण्यावर भर दिला जातो. परंतु ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गातील त्या कामांनाही वेग मिळालेला नाही. त्यामुळे डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणारे काम लांबणार असल्याचे समजतं.

नाहूर, टिटवाळा, शहाड, कसारा, अंबरनाथ, वसई रोड स्थानक, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेन्ट्रल, गोरेगाव, वांद्रे, खार स्थानकात पादचारी पुलांची कामे सुरू होती. परंतु ही कामेही मनुष्यबळाअभावी मंदावली आहेत. लॉकडाऊनपूर्वी ९२० कामगार विविध प्रकल्पांवर काम करत होते. लॉकडाऊननंतर केंद्र, राज्य व रेल्वे प्रशासनाने दिलेल्या मंजुरीमुळे ५६७ कामगार, मजूर कार्यरत होते. मात्र कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या, धास्ती यांमुळे कामगार परराज्यात गेले. सध्या फक्त २२० कामगारांवरच काही कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले.



हेही वाचा -

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण

दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा