कोरोनाचा प्रादुर्भाव (coronavirus) देशात वाढत चालल्याने या संकटाचं गांभीर्य ओळखून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनतेने स्वत:हून जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय रेल्वेनेही (indian railways) रविवारी तब्बल ३ हजार ७०० ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी रविवार २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू (janta curfew) पाळण्याचं आवाहन देशवासीयांना केलं आहे. याच काळात मुंबई मेट्रोने (mumbai metro) देखील आपली सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
In continuation of our fight against #Covid19 and in support of Hon’ble PM’s appeal of #JanataCurfew, #MumbaiMetroOne suspends operations on 22/03/2020 (Sunday) for the entire day, to encourage people to stay at home and make “Janta Curfew” an unprecedented success. #HaveANiceDay
— Mumbai Metro (@MumMetro) March 21, 2020
यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने (railway ministry) परिपत्रक काढून विभागांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार २१/२२ मार्च मध्यरात्री १२ वाजल्यापासून २२ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत तब्बल २२ तास एकही ट्रेन आपल्या सुरूवातीच्या स्थानकापासून रवाना होणार नाही.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेच्या (suburban train) रविवारी किमान फेऱ्याच सोडण्यात येतील. यामध्ये ७ तासांपेक्षा जास्त कालावधीच्या ट्रेनला यातून सवलत देण्यात आली आहे. या प्रवासी ट्रेन आपल्या निर्धारित स्थानकांपर्यंत चालवण्यात येतील.
मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनचं परिचालन रविवारी सकाळी ४ वाजता थांबवण्यात येणार आहे. केवळ सकाळी ४ वाजण्याआधी आपल्या सुरूवातीच्या स्थानकापासून रवाना झालेल्या गाड्यांना आपल्या अंतिम स्थानकापर्यंत पोहोचण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोणत्या ट्रेन रद्द होतील यासंदर्भातील अधिक माहिती आज देण्यात येणार आहे.
दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी जास्तीत जास्त ट्रेन सोडण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला केलं आहे.