पश्चिम रेल्वेवरील गोरेगावपर्यंतच्या विस्तारीत हार्बर मार्गाला अखेर गुढीपाडव्याचा मुहूर्त मिळाला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोरेगाव असा हार्बर मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
या मार्गाचा विस्तार १ जानेवारीपासूनच होणं अपेक्षित होतं. पण, काही तांत्रिक अडचणींमुळे येत्या १८ मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांतर्गत (एमयूटीपी-२) अंधेरी ते गोरेगाव हार्बर विस्ताराचा प्रकल्प आखला. त्याला काही वर्षांचा विलंब होऊन गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस प्रकल्प पूर्ण झाला. पण, तांत्रिक कामं पूर्ण न झाल्याने त्यात अडथळे आले.
आता मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षेची परवानगी मिळाल्यानंतर प्रकल्प सुरू होण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार, सुरुवातीला या मार्गावर ४९ फेऱ्या चालवण्यात येणार असून, एप्रिल-मे पर्यंत आणखी फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डानेही या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, गुढीपाडव्याच्या निमित्ताने या सेवेला हिरवा कंदील दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा-
चाचणी यशस्वी, पण गोरेगावपर्यंत हार्बरला मुहूर्त कधी?